सत्यकथा
वाङ्मयीन गुणवत्तेचा दीपस्तंभ आणि पांढरपेशा ब्राम्हणी साहित्याचा प्रतिनिधी अशी दोन टोकाची भूषणे आणि दूषणे 'सत्यकथा' या मासिकाच्या वाट्याला आली. सत्यकथेच्या आयुष्याचे विविध टप्पे आहेत. मुळात १९३३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मो. ग. रांगणेकर यांच्या संपादकत्वाखाली ते सुरु केले द. शं. कुलकर्णी यांनी. (रांगणेकर केवळ ३ महिने संपादक होते) फक्त खऱ्या आणि घडलेल्या गोष्टी सांगणे असा त्याचा हेतू होता.
१९३६ साली द.पु. भागवत सत्यकथाचे संपादक झाले आणि त्यात राजकीय, सामाजिक लेख येऊ लागले. १९३८ ते ४२ या काळात अनंत अंतरकरांनी कार्यकारी संपादक म्हणून काम पाहताना मासिकाला साहित्यिक स्वरुप येऊ लागले. डिसेंबर १९४३ मध्ये विष्णुपंत भागवत संपादक झाले. रंजनाकडून ते हळूहळू नववाङ्मय, नवे प्रवाह,समीक्षा असे कलावादी स्वरुप सत्यकथेला आले. गंगाधार गाडगीळ, तेंडुलकर, एलकुंचवार, माधव आचवल, रत्नाकर मतकरी अशा लेखकांनी सत्यकथेला सर्वोच्च अभिरुचीचे मासिक असा लौकीक मिळवून दिला.
मात्र या लौकीकानेच हळूहळू सत्यकथेचा खप मर्यादित होत गेला आणि अखेर ते चालवणे आर्थिकदृष्टया परवडेनासे झाले. सत्यकथा चालवणे अगदीच अशक्य झाले तेंव्हा सप्टेंबर १९८२ मध्ये सत्यकथा मराठी वाङ्मयीन इतिहासाचा भाग झाली.
पुनश्च चे सभासदत्व* घ्या.